- तांदूळ जुने व बारीक घ्यावेत, भात मोकळा होतो. नव्या तांदळाचा साखरभात चिकट आणि पांचट होतो.
- भात करताना तांदूळ चांगले शिजवून घ्यावेत. कच्चा भात पाकात घातल्याबरोबर आक्रसतो.
- तांदूळ तुपात भाजल्याने भात मोकळा व खमंग होतो.
- साखरभात करताना नेहमी जेवढे तांदूळ तेवढीच साखर घ्यावी आणि साखरेच्या निम्मे पाणी घालून गोळीबंद पाक करावा. त्या पाकात भात घालावा.
- पाक पक्का झाल्याची खात्री करून मगच भात घालावा नाहीतर भात घातल्यावर पटकन आळून न येता पातळच राहतो.
- गॅस अगदी मंद ठेवावा. त्यामुळे शिते टणक होत नाहीत.
- साखर घालताना सोबत चमचाभर खवा थोडासा भाजून घालावा. साखरभात चविष्ट होतो.
- भातावर ब्रेडचा तुकडा ठेवल्यास साखरभात मोकळा होतो.
- शिजवताना लिंबाचा रस घालून चांगला हलवावा. साखरभात दिसतो तर छानच शिवाय चवही वेगळीच येते.
- भातात रंग घालायचा असेल तर लिंबू पिळू नये. त्यामुळे भात कडवट होण्याची शक्यता असते.
- साखरभात चांगला निवल्यावरच वाढावा. आधी करून ठेवलेला, मुरलेला साखरभात चविष्ट लागतो.
- तांदळाच्या बरोबरीने नारळाचा चव घेतल्यास नारळीभात चवदार होतो.
- भात झाला असे वाटले की गॅसवर जाड तवा ठेवावा व त्यावर भाताचे पातेले झाकून ठेवावे. तवा चांगला तापल्यावर गॅस बंद करावा. भात बराच वेळ गरम राहून मोकळा होतो.
- लवंगाची फोडणी करण्याऐवजी लवंगाची पूड करून भातात वापरल्यास त्याचा वास सर्व भातास सारखा लागतो. तसेच थोड्या लवंगाही पुरतात.
- आदल्या दिवशी करून ठेवून दुसऱ्या दिवशी वाढायचे वेळी कुकरमध्ये गरम करून घेतल्यास भात जास्त स्वादिष्ट लागतो.

No comments:
Post a Comment